संस्कृती

लावणी महाराष्ट्राची लोककला व अस्मिता; ती जपणे ही काळाची गरज – ॲड. शंकर चव्हाण यांचे प्रतिपादन

Spread the love

अंबाजोगाई । प्रतिनिधी :

महाराष्ट्राच्या लोककलेचा श्वास असलेली लावणी आज आधुनिकतेच्या झगमगाटात लोप पावत चालली असताना, तिला नवसंजीवनी देण्याचे महत्त्वाचे कार्य अंबाजोगाई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाच्या माध्यमातून घडताना दिसले. दैनिक लोकनायक व न्यूज लोकमन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांच्या उपस्थितीमुळे हा महोत्सव सांस्कृतिक पर्वणी ठरला.
या भव्य लावणी महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या भाषणात लावणीचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “लावणी ही केवळ नृत्यप्रकार नाही, तर महाराष्ट्राची लोककला, इतिहास, संघर्ष आणि जनतेच्या भावना व्यक्त करणारी कला आहे. आजच्या काळात या कलेला सन्मानाचे व्यासपीठ देणे ही समाजाची आणि शासनाचीही जबाबदारी आहे.” लावणी जपली गेली तरच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख टिकून राहील, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. उद्घाटनप्रसंगी मनोहर आंबा नगरीचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. “लोप पावत चाललेल्या लावणीला जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम संजय जोगदंड हे न्यूज लोकमनच्या माध्यमातून करत आहेत. ग्रामीण आणि लोककलेला व्यासपीठ मिळावे, यासाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर अंबाजोगाईतील युवा उद्योजक व दिग्विजय कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा दिग्विजय बाळासाहेब सोनवणे, चव्हाण मोटर्सचे विकास चव्हाण, अश्विनी मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती दहिवडे, तसेच सुनंदा वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठान लाभले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लावणी कलाकारांनी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात एकापेक्षा एक ठसकेबाज, बहारदार आणि भावपूर्ण लावण्या सादर केल्या. पारंपरिक व आधुनिक शैलींचा सुंदर संगम या सादरीकरणातून पाहायला मिळाला. अंबाजोगाईकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लावणी महोत्सवाचा मनसोक्त आनंद घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी व नाट्यकलावंत अनंत कांबळे यांनी अत्यंत प्रभावी आणि रसाळ शैलीत केले. त्यांच्या निवेदनातून लावणीची परंपरा, तिचा सामाजिक संदर्भ आणि कलाकारांचे योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला. संपूर्ण सभागृहात कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव साजरा होत असल्याचे वातावरण निर्माण झाले होते.
ॲड. शंकर चव्हाण यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, “आजच्या डिजिटल युगातही लावणीसारख्या लोककलेची ताकद कमी झालेली नाही. गरज आहे ती योग्य व्यासपीठ, सन्मान आणि सातत्याची. अशा स्पर्धा आणि महोत्सवांमुळे नव्या पिढीला लोककलेची ओळख होते आणि कलाकारांना आत्मविश्वास मिळतो.” त्यांनी आयोजकांचे विशेष कौतुक करत लावणी कलाकारांच्या संघर्षालाही सलाम केला. या राज्यस्तरीय लावणी महोत्सवाने केवळ स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा जागर करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून आपली छाप उमटवली. लोककलेला जपणारे असे कार्यक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात व्हावेत, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.अंबाजोगाईत पार पडलेला हा लावणी महोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या लोककलेचा उत्सव, कलाकारांच्या कष्टांना मिळालेला सन्मान आणि सांस्कृतिक अस्मितेचा अभिमान ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *