गृहमंत्री ॲक्शन मोडवर कधी येणार? पुणे गुन्हेगारीच्या विळख्यात; गॅंगवॉर, खून, बलात्कार आणि अपघातांनी नागरिक भयभीत” – ॲड. शंकर चव्हाण
**पुणे | प्रतिनिधी :**
राज्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅंगवॉर, खून, बलात्कार, गोळीबार, रस्ते अपघात आणि टोळ्यांच्या दहशतीमुळे पुणे शहर हादरले असून मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा जनहित लोकशाही पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण यांनी राज्य सरकार आणि गृह विभागावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून प्रतिक्रिया देताना ॲड. चव्हाण यांनी “गृहमंत्री ॲक्शन मोडवर कधी येणार?” असा थेट सवाल उपस्थित करत पुण्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “आज पुण्यात सामान्य नागरिक सुरक्षित नाही. महिला, विद्यार्थी, व्यावसायिक आणि लहान मुले यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या गोळीबार, टोळी हल्ले आणि महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत.”
गेल्या काही महिन्यांत पुण्यातील गॅंगवॉरच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. आंदेकर टोळी आणि इतर गुन्हेगारी गटांमधील संघर्षामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूडाच्या भावनेतून हल्ले, खून आणि गोळीबाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. भररस्त्यात हल्ले होणे आणि गुन्हेगारांचे खुलेआम फिरणे ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र संतप्त झाला होता. या घटनेनंतर नागरिकांनी रस्त्यावर उतरून कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. कोरेगाव पार्क परिसरात महिला वकिलावर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे पुण्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या अपघातांच्या घटनाही चिंताजनक ठरत आहेत. भरधाव वाहने, निष्काळजी वाहनचालक आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप केला जात आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघात, हिट-अँड-रन प्रकरणे आणि शहरातील वेगवान वाहनांची दहशत यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
ॲड. शंकर चव्हाण म्हणाले की, “गुन्हेगारांच्या मनात पोलिसांचा धाक उरलेला दिसत नाही. पुणे हे एकेकाळी सुरक्षित आणि शांत शहर म्हणून ओळखले जायचे, पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पालक आपल्या मुलांना बाहेर पाठवताना घाबरत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “घटना घडल्यानंतर आरोपी पकडणे हीच कायदा सुव्यवस्थेची व्याख्या नाही. गुन्हे होण्याआधी ते रोखणे ही पोलिसांची खरी जबाबदारी आहे. मात्र सध्या प्रशासन केवळ घटनांनंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.”
ॲड. चव्हाण यांनी आरोप केला की, “राजकीय हस्तक्षेप, बदलीचे राजकारण आणि स्थानिक गुंडांना मिळणारे संरक्षण यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे.” त्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने विशेष आढावा घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सुरक्षा आराखडा, रात्रीच्या गस्तीत वाढ, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा आणि गॅंगवॉरमध्ये सहभागी टोळ्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्याची मागणीही त्यांनी केली.
ॲड. शंकर चव्हाण यांनी शेवटी सरकारला इशारा देत म्हटले की, “जर पुण्यातील वाढती गुन्हेगारी तात्काळ रोखली नाही, तर सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास उडेल. जनता आता संतप्त झाली असून सरकारने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष ॲक्शन मोडवर येण्याची वेळ आली आहे.”
एकंदरीत, पुण्यात वाढलेल्या गॅंगवॉर, खून, बलात्कार आणि अपघातांच्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, ॲड. शंकर चव्हाण यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

